डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केल्यास यश मिळेल: प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे
सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विशाल दूरदृष्टी असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी डॉ. बाबासाहेबांचे संविधानातील योगदान आणि बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांच्या प्रगतीचे प्रभावी साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जात असून फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक चळवळी बरोबरच शिक्षण चळवळीला प्राधान्य दिले होते. शिक्षण अज्ञानावर मात करणारे शस्त्र म्हणून शिक्षणाचा वापर झाल्याने अनेक पिढ्या शिक्षित झाल्या. त्यातून समाजव्यवस्थेत अनुकूल परिवर्तन घडले. डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात केल्यास मानवी जीवन निश्चित यशस्वी होईल, असे प्रतिपादन प्रा अश्विनी जाधव यांनी केले. या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ओम खंदारे, द्वितीय क्रमांक तेजस सपकाळ व तृतीय क्रमांक आशिष लोखंडे व आयुष येलने या विद्यार्थ्यांनी पटकविला. या कार्यक्रमास रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा अश्विनी जाधव, प्रा सचिन सोळंकी, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post