
नारायणगाव, दि.१५ (वार्ताहर) प्रशांत माने:जुन्नर तालुक्यातील जुन्नर व मढ महसूल मंडळातील २३ गावांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.जुन्नर महसूल मंडलातील पारुंडे, येणेरे, काले, दातखिळवाडी, बुचकेवाडी, काटेडे, विठ्ठलवाडी, गोळेगाव, आलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ, गोद्रे, कुमशेत, आगर, सोमंतवाडी, पाडळी, बागायत बुद्रुक व खुर्द, हापुसबाग, बादशाह तलाव आणि जुन्नर येथे रविवारी (दि. १३) अतिवृष्टी झाली. तर मढ महसूल मंडलातील पारगाव तर्फे मढ, सितेवाडी, वाटखळे, बगाडवाडी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अतिवृष्टी झाली. गारपीट व अतिवृष्टीमुळे बाधित गावांतील कांदा, आंबा व इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट आणि अतिवृष्टीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी तहसीलदार अनंथा गवारी, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, कृषी अधिकारी गणेश भोसले, मंडल अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदीं समवेत मढ महसूल मंडलातील वाटखळे, पांगरी गावाची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकर्यांशी चर्चा करुन त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच अतिवृष्टी व गारपीट झालेल्या गावातील पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. तसेच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यासाठी प्रस्ताव राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाला सादर करावा असे निर्देश दिले.
Discussion about this post