प्रतिनिधी : राजेंद्र टोपले, वांगण सुळे
भर उन्हात बसली धरून सावली गुरं
न्हाई चिंता त्यांची तिन्ही सांजपातूर
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंद
आदिवासी भाग म्हटला की, तिथे डोंगराळ भाग येणार आणि तिथे डोंगराळ भाग असल्याने वेगवेगळ्या प्रकारची प्रजातीची वनस्पती सृष्टी, वेली, झाडे झुडपे, रानमेवा, रानभाज्या, रानफळे या सर्वांची उपलब्धता म्हणजे आदिवासींना निसर्गाने दिलेला एक वरदानच आहे.
आदिवासी भागातील बांधवांना जंगलातील वनस्पती बरोबरच रानफळांचे, रानमेवांचे आस्वाद हे वसंत ऋतूत चाखायला मिळत असतात. यापैकी एक म्हणजे ‘ करवंद ‘ हे फळ पिकून काळ्या रंगाने झाडावर बहरून गेलेली असतात. करवंदाला डोंगरची काळी मैना असेही संबोधले जाते.करवंदे पिकली असतांना जंगलातील विविध प्रकारचे पक्षी करवंदाच्या झाडावर घिरट्या मारत पिकलेल्या फळांवर यथेच्छ ताव मारत मोठ्या आवडीनं खात असतात.
साधारणतः जानेवारी महिन्यापासून करवंदाच्या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. नंतर हिरव्या रंगाची लहान लहान फळे येतात. एप्रिल, मे महिन्यात करवंद हे रानफळ पिकून पूर्णपणे काळ्या रंगाच्या फळांनी भरून जाते. करवंद हे रानफळ आंबट, गोड, कडु ह्या वेगवेगळ्या चवीची असून मोठ्या प्रमाणात आढळतात. कच्च्या करवंदापासून खारना , लोणचं असे अनेक पदार्थही बनवले जातात.
आदिवासी भागात जवळपास डिसेंबर महिन्यापासून लग्न सराईला सुरुवात होते. या लग्न समारंभात,तसेच विविध कार्यक्रमात अनेक वनस्पती, पशु पक्षी, वेली, फुले म्हणजेच निसर्गावर आधारित अनेक प्रकारचे लोकगीते गायली जातात.
आदिवासी बांधव हा पिढ्यानपिढ्या जंगलात, दरी खोऱ्यात राहत असल्याने निसर्गाप्रति असलेले प्रेम, भावना या लोकगीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतात. आदिवासी महिलांच्या तोंडून साखरपुडा, लग्न कार्यात वेगवेगळ्या प्रकारची लोकगीते गायली जातात.
बारीक करवंदे करवंदे तुज पान,
बारीक करवंदे तुज पान वं .
गोणी भरल्या भरल्या हळदीच्या,
गोणी भरल्या हळदीच्या वं .
अशा प्रकारच्या अतिशयोक्ती अलंकारांनी समृद्ध अशी निसर्ग वर्णन असलेली ही लोकगीते लग्न कार्य, साखरपुडा व इतर पारंपरिक कार्यक्रमात आजही मोठ्या प्रमाणात आनंदाने गायली जातात.
त्याचप्रमाणे करवंद हे आरोग्यदायी असल्याने आदिवासी बांधव मोठ्या आनंदाने या रामफळांचा आस्वाद घेतांना आपल्याला आजही दिसतात.
Discussion about this post