आज झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सकाळ पासून मतदानाची सुरुवात अत्यंत संथ गतीने झाली, मात्र जसा दिवस वाढत गेला तसा मतदानाचा टक्काही वाढत गेल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार दिसून आले. आज जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. आज झालेल्या मतदानानुसार प्रशासनाच्या अंदाजानुसार सायंकाळी ७.३० पर्यंत ७० टक्के इतके मतदान झाले असण्याची शक्यता आहे. यामध्ये वाळवा पलूस कडेगाव तालुक्यात सर्वाधिक कवठेमहांकाळ जत खानापूर तालुक्यात तुलनेने कमी मतदान नोंदले गेले आहे. मिरज तालुक्यात ४७ टक्क्याच्या आसपास मतदानाची नोंद झाली आहे. तर शिराळा आटपाडी तालुक्यामध्ये सरासरी ५० टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. आज सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील मतदान केंद्रामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रत्येक मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करत होते.




