पुणे : पीएमपीएमएल बसच्या अपघातात मृत्यू किंवा दुखापत झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएमपीएमएलकडून स्वतंत्र धोरण निश्चित करण्यात आले असून, अपघातात मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना ३ लाख रुपये, तर जखमींना १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.
यापूर्वी बस अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद होती. आता या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
मालमत्ता नुकसानीसाठीही स्वतंत्र धोरण
पीएमपीएमएल बसच्या अपघातामुळे दुकान, घर, वाहन किंवा अन्य वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठीही स्वतंत्र धोरण निश्चित करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त मालमत्तेचे मूल्यांकन तज्ज्ञांकडून करून त्यानुसार नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
विशेष सभेत प्रस्तावाला मंजुरी
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने पीएमपीएमएलच्या विशेष सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला. उपस्थित सदस्यांच्या चर्चेनंतर प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र दावा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आवश्यक कागदपत्रांच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. न्यायालयीन दाव्यांमध्येही या धोरणानुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अप्पा बळवंत चौक अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय
२१ एप्रिल २०२६ रोजी अप्पा बळवंत चौक परिसरात झालेल्या पीएमपीएमएल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीच्या मूल्यांकनानुसार संबंधित नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पीएमपीएमएल बस अपघातात जीवितहानी किंवा दुखापत झालेल्या नागरिकांसह मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.








