गेवराई (प्रतिनिधी)
जातेगाव नगरीच्या वैभवात भर घालणारी एक आनंदाची घटना म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नवीन शिवस्मारकाचे काम तरुणांच्या अथक परिश्रम व शिवभक्तांच्या सहकार्याने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून काढलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण गाव शिवमय झाले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. विशेष म्हणजे, उत्सवात कुठेही त्रासदायक आवाज होऊ नये म्हणून डीजे बंद ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वातावरणात हा सोहळा पार पडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवस्मारक समितीच्या नियोजनानुसार मिरवणूक शांततेत व नियोजनबद्ध रितीने पार पडली. ढोल-ताशा पथकांनी वातावरणात उत्साह निर्माण केला, मात्र तरुणाईने संयम व शिस्त राखत महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आनंदाने सहभागी होण्याची संधी दिली. भगव्या पताका, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईमुळे गावाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.
या प्रसंगी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षा सौ. शितलताई धोंडरे यांनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त करताना सांगितले, “मी तुमची छोटी-मोठी बहीण म्हणून आणि समितीच्या अध्यक्षा म्हणून सर्व शिवभक्तांचे मनःपूर्वक आभार मानते. तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि सहकार्य कधीही विसरणार नाही. हाच महाराजांना मानाचा खरा मुजरा आहे. मी आपली कायम ऋणी राहीन.”
शांतता राखणे हे मोठे आव्हान असते; मात्र जातेगावच्या शिवभक्तांनी प्रशासन व समितीला संपूर्ण सहकार्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे’च्या घोषणांनी गावाचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला. हा शिवजन्मोत्सव केवळ जल्लोषाचा नसून शिस्त, सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचा संदेश देणारा ठरला. आसपासच्या परिसरातील तरुण व पालकांनी आदर्श घ्यावा असा हा कार्यक्रम निर्विघ्न व यशस्वीपणे पार पडला.



