दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना सर्वच क्षेत्रामधील मान्यवरांकडून श्रद्धांजली समर्पित…
मुंबई : प्रफुल्ल शेवाळे
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित मुंबई वरळी येथील सर्वपक्षीय शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या. सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती.
दादांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन दिवस-रात्र झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, ही जाणीव उपस्थितांच्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षाने जाणवत होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले, हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे.
दादांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टीतून आखलेला विकासाचा मार्ग आणि लोकहितासाठीची अखंड तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे. त्यांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमाने कार्यरत राहणे, हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरळी येथील एन एस सी आय डोम येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला उपस्थित राहून दादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. अजितदादांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन येणार नाही. यावेळी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सह राज्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज राजकीय, राज्य मंत्रिमंडळ तसेच केंद्रीय मंत्री गण,उद्योजक इतर मान्यवर आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहीनी पवार यांच्या सह पार्थ पवार आणि जय पवार समस्त उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करताना दिसत होते.








