“विज्ञाननिष्ठ विचार, तंत्रज्ञानसाक्षर युवा आणि सक्षम सिंधुदुर्ग”
तळेरे | अंकित घाडीगांवकर
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने माय भारत सिंधुदुर्ग यांच्या पुढाकारातून कणकवली तालुक्यात विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची अंमलबजावणी सिंधू फाउंडेशन, प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. या सत्रांना एकूण ९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
कासार्डे ज्युनियर कॉलेज येथे आयोजित सत्रात श्री. दिवाकर पवार यांनी विज्ञान शाखेतील विविध करिअर संधी, संशोधनाची व्याप्ती तसेच विज्ञानाच्या सैद्धांतिक व प्रायोगिक उपयोगाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी विश्लेषणात्मक विचारसरणी, प्रयोगशीलता आणि संशोधनवृत्ती विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले. विज्ञान हे केवळ शैक्षणिक विषय नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.
तळेरे येथील श्रावणी कंप्युटर तळेरे येथे झालेल्या दुसऱ्या सत्रात संचालक श्री. सतीश मदभावे यांनी विज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्य विकास याविषयी सखोल मार्गदर्शन केले. AI चा शिक्षण, करिअर नियोजन, प्रकल्पनिर्मिती आणि रोजगारनिर्मितीत प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक उदाहरणांसह विवेचन करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर केवळ उपभोगासाठी नव्हे, तर निर्मिती आणि नवोन्मेषासाठी करावा, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. श्रावणी मदभावे यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले. युवकांना विज्ञाननिष्ठ, कौशल्यसंपन्न आणि भविष्याभिमुख बनविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला चालना देणारा ठरला असून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम युवा घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.









