पालघर प्रतिनिधी :
दि. २७ ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून सुनील भुसारा यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), जव्हार तालुका यांच्या वतीने आपटाळे ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येकी तीन जिल्हा परिषद शाळांना संगणक संचांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष तथा कोरतड सावरपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप माळी यांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. संजय रानडा यांच्या संयोजनातून आपटाळे, कापरिचापाडा आणि गंगापूर येथील प्रत्येकी एका जिल्हा परिषद शाळेला संगणक संच देण्यात आला.
यावेळी तालुका युवक अध्यक्ष विनोद मौळे, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष संजय भला, विद्यार्थी सेल प्रमुख राहुल घेगड, उपाध्यक्ष नरेश मुकणे, दीपक गावंढा, उपसरपंच सुभाष भोरे तसेच मच्छिंद्र कोरडा, जितेंद्र डोके, संतोष गोविंद, रामदास तराळ, नानू गवळी, बाबू सुनाड, मोहन दखणे, काशिनाथ भोये, संतोष भला, रुपेश भोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपटाळे जिल्हा परिषद शाळेत संगणक वाटपाबरोबरच ढोलनाच पथक व ‘डाक भक्ती’ पथकाचा सत्कार करण्यात आला. आदिवासी सेलचे अध्यक्ष संजय भला यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा, प्रथा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन केले. युवक अध्यक्ष विनोद मौळे यांनी गावकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थी सेल प्रमुख राहुल घेगड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाकाळात ये-जा सुलभ व्हावी यासाठी ‘अति आवश्यक सेवा’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याची घोषणा केली. दीपक गावंढा यांनी शरद पवार यांच्या विचारधारेची आणि पक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती उपस्थितांना दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना संदीप माळी यांनी विद्यार्थ्यांबद्दलचा जिव्हाळा आणि ज्येष्ठांबद्दलचा आदर व्यक्त करत समाजकारणाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. शिक्षणविकास, ग्रामीण भागातील सुविधा आणि सामाजिक एकात्मता या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला.
कार्यक्रमास आपटाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग भोये, सदस्य सुनील किनर तसेच शालेय व्यवस्थापन समिती व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला.









