कणकवली तालुका (प्रतिनिधी) ⚓ देवगडचा खोळंबा आणि मनातील काहूर : कथेची सुरुवातच एका विलक्षण आठवणीने होते. देवगड बंदरात बोट बिघडते आणि लेखकाला लहानपणीचा शब्दप्रयोग आठवतो – गावात कुणी वारलं की म्हटलं जायचं, “म्हातारो देवगडाक गेलो!” आज लेखक स्वतः त्या बंदरात अडकलाय आणि मनाशीच हिशोब मांडतोय की गावातले कोण कोण जुने चेहरे कायमचे ‘देवगडाला’ गेले असतील.

👵 ती आजीची विडी आणि हरवलेले बालपण : घरात शिरल्यावर लेखक तडक कोठीच्या खोलीत जातो. तिथे दाट काळोख आहे, कोळीष्टकं आहेत. पण त्याच अंधारात त्याला भास होतो – आपली आजी तिथे बसून चोरून विडी ओढत असावी. खिडकीच्या बारीवर हात फिरवल्यावर धुळीत विझलेली विडी सापडते. ती आजीचीच का? तो शेवकांडीच्या लाडवांचा गोडवा, आजीला विड्या आणून देताना केलेली ती निष्पाप फसवणूक… या आठवणींनी लेखकाचे मन कातर होते.
💔 ‘नांदते’ घर आणि रिता देव्हारा:
कथेतील सर्वात हृदयद्रावक प्रसंग म्हणजे आपटे भटजींनी देवापुढे घातलेलं गाऱ्हाणं:
”देवा महाराजा, या घराचा धनी तुझ्या पायाशी आला आहे… हे घर नांदते राहू दे!”
पण सत्य काय आहे? देव्हाऱ्यातली समई तेलाअभावी विझत आली आहे. लेखक म्हणतात, “माझा वंश वाढला, पण हे घर मात्र नांदले नाही.” आपण शहरात मोठे झालो, मुलंबाळं झाली, पण ज्या घराच्या भिंतींनी आपल्याला मोठं केलं, त्या आज पोरक्या झाल्या आहेत.
😔 नाऱ्या गडी आणि झिलू केदारची ती निष्ठा:
पूर्वी गावात येणं म्हणजे एक उत्सव असायचा. झिलू केदार मटण-भाकरी घेऊन बंदरावर वाट पाहायचा. ‘आपू’ आला म्हणून त्याला होणारा आनंद हा रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा होता. नाऱ्या गड्याचा तो भाबडा प्रश्न, “त्रास झाला का प्रवासात?”… त्या वेळी या माणसांच्या निष्ठेची किंमत कळली नाही, पण आज जेव्हा घरात स्वागत करायला कुणीच नाही, तेव्हा त्या मायेची किंमत काळजाला भिडते.
🔥 चूल पुन्हा पेटायला हवी होती…
आपटे भटजींच्या डब्यातले घास गळ्यात रेटताना लेखकाला ठसका लागतो. हा ठसका कुणाच्या आठवणीचा असेल? ज्या घरात कधीकाळी पंगती उठायच्या, तिथे आज मालक ‘परक्या उतारूसारखा’ जेवतोय.
”मुंबईहून बायका-मुलांना बरोबर आणायला हवे होते. या घरातली चूल खूप दिवसांनी पुन्हा एकदा पेटवायला हवी होती… कौलांवर निळा धूर तरंगायला हवा होता.”
आपणही वर्षातून एकदा तरी आपल्या गावी, त्या जुन्या घरात जायला हवं. तिथली चूल पेटवायला हवी. घराला घरापण देणारी माणसं गेली, तरी त्या वास्तूत आपल्या पूर्वजांचे आत्मे आजही आपली वाट पाहत असतात.
सारे प्रवासी घडीचे


