जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील दिघोळ गावातील महावितरणच्या जीर्ण झालेल्या वीज यंत्रणेमुळे नागरिकांना वारंवार अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दिघोळ गावातील अनेक वीज खांब व तारा सुमारे ३५ वर्षांपूर्वीचे असून ते अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. अनेक खांब गंजलेले असून वीज तारा कमकुवत झाल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डीपी जळणे, फ्यूज उडणे, विविध तांत्रिक बिघाड तसेच देखभाल-दुरुस्तीतील विलंब यामुळे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरगुती वापरासह शेती आणि व्यावसायिक कामकाजावरही परिणाम होत आहे.
गावातील वाढत्या वीज वापरामुळे विद्यमान रोहित्रांवर अतिरिक्त ताण येत असून ती वारंवार निकामी होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. महसूल वसुलीच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव असतानाही आवश्यक सुविधा आणि दुरुस्तीची कामे होत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिघोळ व माळेवाडी परिसरातील वीज यंत्रणेची प्रभावी दुरुस्ती करण्यात यावी, जीर्ण खांब व तारा तातडीने बदलून आधुनिक केबल वायर टाकण्यात याव्यात, तसेच मंजूर झालेले ३२ केव्ही उपकेंद्र (सबस्टेशन) लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास दिघोळसह परिसरातील पाच ते सहा गावांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठ्याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.








