कुरुंदवाड | प्रतिनिधी :
पंचायत समिती शिरोळ अंतर्गत शिरढोण (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शेतकरी, महिला बचत गट सदस्य तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला पंचायत समिती शिरोळचे सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, ग्रामपंचायत शिरढोणचे प्रशासक सागर भंडारे, ग्रामपंचायत सदस्य ललिता जाधव व शक्ती पाटील, माजी उपसरपंच अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व अजय भोसले, ग्रामसेवक विराज जथे, तालुका अभियान व्यवस्थापक संपदा भोपळे, तालुका व्यवस्थापक स्मिता सम्यक, प्रभाग समन्वयक सोनाली हराळे तसेच कृषी व्यवस्थापक अनुराधा पाटील-उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वयं-सहाय्यता बचत गटांची भूमिका, उद्योजकता विकास आणि स्वावलंबन याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच महिलांना बचत, कर्ज सुविधा, उद्योग-व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात उमेद अभियानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करत रासायनिक खतांचा मर्यादित वापर, सेंद्रिय खतांची निर्मिती, जैविक कीडनियंत्रण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाश्वत शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचा आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.









