दर्यापूर | प्रतिनिधी
दर्यापूर येथील अयोध्या नगर ते समर्थ नगर या मुख्य रस्त्यावरील नालीच्या दोन्ही बाजूंना माती अथवा मुरूमाची भर टाकण्यात न आल्याने रस्ता धोकादायक बनला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नालीलगतची भरावाची कामे अपूर्ण असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा वाहने बाजूला घेताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांनी संबंधित ठेकेदाराकडे ही समस्या मांडून काम पूर्ण करण्याची मागणी केली असता, ठेकेदाराने उद्धटपणे वागणूक देत काम करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्याची पाहणी करून नालीच्या दोन्ही बाजूंना आवश्यक भराव टाकण्याची, रस्ता सुरक्षित करण्याची आणि तक्रारीची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
