वैजापूर | प्रतिनिधी
देवगाव शनी येथील गायरान जमीन (गट क्रमांक २१) परिसरातील कथित अवैध उत्खनन प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार यांनी मंगळवारी (दि. ७ जुलै) सकाळी साडेदहा वाजता भर पावसात सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उपोषणादरम्यान पवार यांनी गट क्रमांक १८ साठी देण्यात आलेल्या रॉयल्टीची सर्व कागदपत्रे, मायनिंग मॅपिंगद्वारे मोजणी, ईटीएस अहवाल तसेच महसूल विभागाकडून झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच तक्रारीनंतर आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचाही आरोप त्यांनी केला.
याशिवाय, हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा दावा करत असताना महसूल प्रशासनाने केवळ ५० ब्रास उत्खननाची नोंद कशी केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
गोदावरी नदीला पूर आल्यास संबंधित गटांतील खड्डे बुजण्याची शक्यता असून त्यापूर्वी योग्य मोजणी व तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास देवगाव शनी येथील गायरान जमिनीवर पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, तसेच संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
