श्रीगोंदा | प्रतिनिधी
कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः येडगाव धरणात ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्यानंतर कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी विसापूर धरणात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
आमदार पाचपुते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून विसापूर धरणाची सद्यस्थिती आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याची गरज निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात पाणी सोडण्यास प्रशासनाने मंजुरी दिली.
या निर्णयामुळे विसापूर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप तसेच आगामी रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार असून सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले…
“कुकडी प्रकल्पात पाण्याची चांगली आवक होत असताना त्याचा फायदा आपल्या भागातील शेतकऱ्यांना होणे गरजेचे होते. यासाठी मी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. प्रशासनाने पाणी सोडण्यास मंजुरी दिली असून यामुळे आपल्या भागातील बळीराजाला मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहतील.”
