मुंबई प्रतिनिधी : श्री. शांताराम जायगडे
मुंबई : कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी उत्कर्ष कुणबी संस्थेच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून एसटी महामंडळाच्या गाड्या ना नफा, ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यंदाही संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त तब्बल १५ एसटी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद चिंचवलकर यांनी दिली.
मुंबईहून चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, साखरपा मार्गे देवडे आदी ठिकाणी जाणाऱ्या गणेशभक्त व चाकरमान्यांना या बससेवेचा लाभ मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी जात असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी, या उद्देशाने संस्थेकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
उत्कर्ष कुणबी संस्था गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून, संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेत तिला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या उपक्रमामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.







