जत प्रतिनिधी : अरुण कोळी
जत शहरातील नळपाणी योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवानुभव मंडपासमोरील रस्ता गेल्या आठ दिवसांपासून खड्ड्यात असून, अद्याप खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिक, भाविक तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नळपाणी योजनेच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व मातीचे ढिगारे असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
शिवानुभव मंडप परिसरात शाळा असल्याने या मार्गावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर भाविकांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शाळेच्या गेटसमोरच मोठा खड्डा
शाळेच्या गेटसमोरच रस्ता खोदण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.
“काम करा, पण नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन रस्ता तातडीने पूर्ववत करा,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.









