(प्रतिनिधी : शेख मोईन)
किनवट : राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनासह पोलिस यंत्रणेकडून काही काळ धडक कारवाई करण्यात आल्याने किनवट शहर व परिसरातील खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा जोर कमी झाल्याचे चित्र दिसत असून शहरातील अनेक भागांत पुन्हा खर्र्याची खुलेआम विक्री सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांना पुन्हा मोकळे रान मिळाले का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद किनवट शहरातही उमटले होते. त्याच काळात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून चंद्रशेखर कदम यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या टीमने तसेच किनवट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या C-47 पथकाने प्रतिबंधित तंबाखूमिश्रित खर्रा, इतर तंबाखूजन्य पदार्थ, अवैध दारू, मटका आणि इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला होता.
या कारवायांमुळे शहरातील अनेक पान सेंटर काही काळ बंद राहिल्याचे दिसून आले होते. खर्रा विक्री तसेच निर्मितीशी संबंधित व्यावसायिकांमध्येही मोठी धावपळ उडाली होती. पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये काही काळ धाक निर्माण झाला होता.
मात्र, आता परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. शहरातील काही भागांत पान सेंटर तसेच इतर ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पुन्हा सुरू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा धाक कमी होताच काही विक्रेते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर विशेषतः तरुणांमध्ये वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने केवळ अधूनमधून कारवाई न करता सातत्याने तपासणी व धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खर्रा विक्रीची ठिकाणे, निर्मिती करणारे आणि पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून पुन्हा व्यापक मोहीम राबविली जाणार का, तसेच शहरातील खर्रा विक्रीवर आळा घालण्यासाठी पुढील काळात कोणती पावले उचलली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









