(प्रतिनिधी:शेख मोईन)
किनवट:सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळून किनवट तालुक्यातील मौजे धामणधरी येथील एका ३० वर्षीय अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
निखिल दिलीप जाधव वय ३० वर्ष, रा. धामणधरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत निखिल जाधव यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि सतत होत असलेल्या नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. बँक व सावकारी कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत ते गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते.
दरम्यान, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास निखिल हे शेताकडे फेरफटका मारण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. शेतात गेल्यानंतर त्यांनी नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर ते शेतात गंभीर अवस्थेत आढळून आले.
गावकऱ्यांच्या मदतीने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असतानाच रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ऐन उमेदीच्या काळात तरुण शेतकऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे धामणधरी गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, बाधित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.









