पनवेल प्रतिनिधी | संदिप जाधव
| पनवेलः पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी करत पनवेल महानगरपालिकाने “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत ‘अमृत शहरे’ (३ लाख ते १० लाख लोकसंख्या) गटामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्तम हरित यश संपादन केले आहे.
आज दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मानाचा माझी वसुंधरा ४.० आणि ५.० अभियानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पनवेल महानगरपालिकेचेवतीने महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपआयुक्त स्वरूप खारगे व उपआयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माझी वसुंधरा ५.० करिता एकूण ७ कोटी इतके बक्षीस जाहीर झाले असून यापूर्वीही माझी वसुंधरा ४.० करिता एकूण ७ कोटी इतके बक्षीस प्राप्त झाले आहे. शहरात विविध हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच वसुंधरेबाबत जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला.
महानगरपालिकेने माझी वसुंधरा
अभियानांतर्गत केलेली कामगिरी
*भूमी या घटका अंतर्गत मनपाने वर्षभरात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. झाडाचे संगोपन करून त्यांना जगवले. कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती.
*वायू या घटकात मनपाने अभियान कालावधीत हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना केल्या. सण उत्सवात प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवतात शहरातील तयार होणारा बांधकाम, पाडकामाचा राडारोडा, कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली.
*जल या घटकात मनपाने शहरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाय योजना केल्या. शहरातील पाणीसाठ्यांची साफसफाई केली. शहरातील वडाळे तलाव व इतर तलावांमध्ये स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वाटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. गणपती विसर्जन दरम्यान जल प्रदूषण टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना त्याचे फायदे तोटे समजावून सांगून इको फ्रेंडली मूर्तींच्या विक्रीसाठी व नागरिकांनी खरेदी करावी यासाठी प्रयत्न केले.
*अग्नी या घटकात मनपाने शहरात एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. शहरात विविध उद्यानात सोलर ट्री उभारले. विविध शासकीय इमारतींवर रूफ टॉप सोलार लावले. खाजगी तत्त्वावर घरांवर सोलर बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट करून त्यावर उपाययोजना केल्या.
*आकाश या घटकात मनपाने नागरीकांमध्ये अभियानाची माहिती पोहोचण्यासाठी स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरातील पर्यावरण प्रेमी व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून निवड करून विविध कार्यक्रमाद्वारे व त्यांच्या सहभागाने शहरात जनजागृती करत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या सर्व उपाययोजांमुळे महानगरपालिकेला या वर्षीही पुरस्कार मिळाला आहे.
महानगरपालिकेने ‘हरित पनवेल, स्वच्छ पनवेल, प्रगतीशील पनवेल’ या ध्येयवाक्याने नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवत पर्यावरण संरक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. यामध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अभियानात प्रशासन आणि लोकसहभाग यांचा उत्कृष्ट समन्वय दिसून आला.
महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले की, “हा सन्मान संपूर्ण पनवेलकरांचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यामुळेच आज आपण राज्यात प्रथम क्रमांक पटकावू शकलो.”
आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी–कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे विशेष अभिनंदन करत भविष्यातही पर्यावरणपूरक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
“पर्यावरणीय शाश्वततेसाठी आखलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नियमित परीक्षण आणि पारदर्शक कामकाजामुळे पनवेल महानगरपालिकेला राज्यस्तरावर सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले” अशी भावना पर्यावरण विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी व्यक्त केली.








