” कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही” – एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत स्पष्ट इशारा
माहूर प्रतिनिधी –
किनवट पंचायत समिती येथे गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची बैठक किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मतदारसंघातील आरोग्य सेवा, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत आमदार भीमराव केराम यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देत कामातील दिरंगाई, हलगर्जीपणा व निष्काळजीपणाबाबत कडक शब्दांत तंबी दिली. “सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. कोणत्याही अधिकाऱ्याकडून कामात टाळाटाळ किंवा दिरंगाई झाल्यास ती सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना केली असून, आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे ही समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
बैठकीस पंचायत समिती किनवटच्या गटविकास अधिकारी सौ. जयश्री वाघमारे, पंचायत समिती माहूरचे गटविकास अधिकारी श्री. ज्ञानेश्वर टाकरस, समितीचे सचिव डॉ. के. पी. गायकवाड, भाजप विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे, माजी सभापती दत्ता आडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे निर्देश आमदार केराम यांनी दिले.
बैठकीच्या शेवटी जनहिताची कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करून प्रशासनाने लोकाभिमुख आणि उत्तरदायी कार्यपद्धती स्वीकारावी, असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.






