शहादा,दि.05 (प्रतिनिधी)
शहादा शहरात तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून सध्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याला केमिकल व रंगासारखा तीव्र वास येत असून हे अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे अनेक नागरिकांना मळमळ, उलटी व जुलाबाचा त्रास होत आहे.
शहादा नगरपालिकेकडून वर्षाला दोन हजार रुपये नळपट्टी वसूल केली जात असतानाही गेल्या दोन आठवड्यांपासून अशुद्ध पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नगरपालिकेकडून तापी योजनेतून शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवले जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती गंभीर आहे. आधीच शहरात दोन तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यातही दूषित पाणी येत असल्याने शहादा नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.या गंभीर समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींमार्फत पाणीपुरवठा विभाग तसेच मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभाग व प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना नाइलाजाने अशुद्ध पाणी वापरावे लागत आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून आता तरी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी शहादा शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.









