हदगाव | प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील खरबी शिवारासह परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
यावर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे वळत मोठ्या अपेक्षेने उत्पादन घेतले होते. मात्र, काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आलेल्या तुफानी वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. खरबी व आजूबाजूच्या गावांतील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची झाडे कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
घटनेची माहिती मिळताच तलाठी कोथळकर आणि कृषी सहाय्यक संगमवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली. नुकसानीचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ तुटपुंजी मदत न देता प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खरबीचे सरपंच हेमंत नरवाडे यांनी केली आहे. त्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करावी, असे आवाहनही केले.
अवकाळी पावसामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता केळी पिकाच्या नुकसानीमुळे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










