अक्राणी प्रतिनीधी_
थेवापाणी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम पार पडला._
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम रामजी वळवी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
यानंतर इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी दुर्गा शांताराम वळवी हिने भारतीय संविधानाची उद्देशिका आत्मविश्वासाने आणि स्पष्ट उच्चारात तोंडपाठ सादर केली.तिच्या सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांची भव्यता आणि लोकशाही मूल्यांची ताकद प्रत्येकाच्या मनात ठसली.
कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे उपशिक्षिका श्रीमती स्नेहल सर्जेराव गुगळे यांचा सहा वर्षाचा मुलगा कुमार साई याने साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा व शाळेतील विद्यार्थ्यांनी थेवापाणी पाड्याच्या मुख्य रस्त्यावरून काढलेली रॅली हा कार्यक्रमाचा प्रेरणादायी क्षण ठरला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” तसेच “जेथे एकता तिथे सुरक्षितता” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या बालपण, शिक्षण आणि जीवनकार्यावर भाषणांद्वारे आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या मनोगतातून जिद्द, स्वप्न आणि उज्ज्वल भविष्याची आशा स्पष्टपणे जाणवत होती.
उपशिक्षिका श्रीमती स्नेहल गुगळे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा प्रभावी आढावा घेतला. वर्गाबाहेर बसून सुरू झालेल्या शिक्षणापासून ते अथक परिश्रम व ज्ञानाच्या बळावर देशाचे मार्गदर्शक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी प्रेरणादायी शब्दांत मांडला. मुख्याध्यापक चंद्रकांत सपकाळे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला समानता व न्यायाचा अधिकार प्राप्त झाला आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात दृढ झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते, ते आपल्या भारतात जन्माला आले हे सर्व भारतीयांचे सदभाग्यच आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गोडवा,समता आणि प्रेरणा यांची आठवण राहावी,या पवित्र भावनेतून या कार्यक्रमावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पाव किलो बुंदी पाकीट वाटप करण्यात आले—हा केवळ प्रसाद नव्हता, तर बाबासाहेबांच्या विचारांचा गोड, समतेचा आणि एकतेचा संदेश होता.
तसेच भाषणात सहभागी विद्यार्थ्यांना श्री. शांताराम रामजी वळवी यांच्या हस्ते वही व पेन बक्षीस देऊन त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले—हा क्षण विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर प्रेरणादायी ठरणारा ठरला.
थेवापाणी सारख्या अतिदुर्गम भागात इतक्या उत्साहात साजरी झालेली ही जयंती जिद्द, एकता आणि शिक्षणाच्या शक्तीचा जिवंत आदर्श ठरली. या कार्यक्रमातून एकच संदेश स्पष्ट झाला—परिस्थिती कितीही कठीण असली तरी विचार आणि शिक्षणाची ज्योत पेटती ठेवली, तर प्रगतीचा मार्ग नक्कीच खुला होतो.
या प्रेरणादायी उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम रामजी वळवी, सर्व ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रतापपूर केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रंजनाताई निकुंभे यांचे मार्गदर्शन लाभले.








