
बोथ (ता. केळापूर, जि. यवतमाळ) | प्रतिनिधी
केळापूर तालुक्यातील बोथ गावातील आईच्या देवळाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असून, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व घाण पाणी साचत असल्याने भाविक आणि ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
देवळात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना साचलेल्या पाण्यातून आणि चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. रस्त्यावर खोल चिखल झाल्यामुळे पायी चालणे कठीण झाले असून दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा ग्रामपंचायतीकडे मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच देवळाकडे जाणारा मार्ग सुरक्षित व स्वच्छ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. यासोबतच काम कधी सुरू होणार याबाबत ग्रामस्थांना स्पष्ट माहिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.





