बांबवडे | प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर घालण्यात आलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर (दादा) यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली होती. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
पर्यटनावरील बंदीमुळे तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक, टॅक्सीचालक, लहान-मोठे विक्रेते तसेच पर्यटनावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षेचे सर्व नियम पाळून पर्यटन स्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली करावीत, जेणेकरून स्थानिक व्यावसायिकांचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील आणि रोजगाराला चालना मिळेल, अशी मागणी सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक नागरिकांचे आर्थिक हित आणि पर्यटन व्यवसायाचा विचार करून प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




