अंबरनाथ / प्रतिनिधी
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात शांतता कायम राहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांना शांततेचा संदेश दिला.
शहरातील विविध भागातून मोठ्या बंदोबस्तात हा रूट मार्च पार पडला. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रूट मार्चदरम्यान नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. अतिसंवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रमुख चौक, बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांच्या या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून बकरी ईदचा सण शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.






