पालघर | प्रतिनिधी
केळवारोड परिसरात अलीकडे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (११ जुलै) प्रांत अधिकारी मदनूरकर, नायब तहसीलदार शिंदे तसेच केळवारोडचे तलाठी यांनी केळवारोड रेल्वे ब्रिज ते देवीपाडा स्मशानभूमीपर्यंतच्या ओहळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आगरी सेना जिल्हाप्रमुख चेतन गावड यांनी अधिकाऱ्यांना पूरस्थितीमागील प्रमुख कारणांची माहिती देत भविष्यात पूराचा धोका टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
प्रमुख मागण्या
- केळवारोड धरणातील गाळ तातडीने काढावा, कारण गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४० टक्क्यांनी घटल्याचे सांगण्यात आले.
- धरणापासून खाडीपर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या ओहळाचे खोलीकरण व रुंदीकरण करावे. गाळामुळे ओहळाची वहनक्षमता सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाल्याने तो किमान १० फूट खोल आणि आवश्यकतेनुसार अधिक रुंद करण्याची मागणी करण्यात आली.
- धरणापासून रेल्वे ब्रिज क्रमांक ११५ पर्यंत ओहळाच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटवून किमान ३० फूट रुंदीचे क्षेत्र मोकळे करण्यात यावे, जेणेकरून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील.
- रेल्वे ब्रिज क्रमांक ११५ ते देवीपाडा मार्गावरील जलनिकासी व्यवस्था सुधारावी. विद्यमान व्यवस्थेऐवजी मोठ्या व्यासाचे पाइप किंवा अन्य योग्य अभियांत्रिकी उपाययोजना करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
प्रांत अधिकारी मदनूरकर यांनी या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी आगरी सेना जिल्हाप्रमुख चेतन गावड, उपसरपंच अतुल हाडळ, सुभाष किरमिरे, अक्षय वेडगा, समीर घरत, विशाल पाटील तसेच देवीपाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
