श्रीरामपूर | प्रतिनिधी
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवून उत्तर अहिल्यानगर विभागातील १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहिल्यानगरमधील १७ पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शनिवारी (दि. ४ जुलै) विशेष ओळख परेड घेण्यात आली.
या मोहिमेदरम्यान गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात आले तसेच त्यांच्याकडून सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. त्यामध्ये कुटुंबीयांची माहिती, सध्याचा व्यवसाय, वास्तव्य, वापरातील वाहने आणि इतर महत्त्वाची माहिती नोंदविण्यात आली.
याशिवाय, कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या समक्ष भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२९ अंतर्गत सर्व १२१ गुन्हेगारांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचे जामीन बंधपत्र लिहून घेण्यात आले. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
या विशेष मोहिमेमुळे परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
