उरुळी कांचन (पुणे) | प्रतिनिधी
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी आणि भाविक पुणे–सोलापूर महामार्गावरून मार्गक्रमण करणार असल्याने प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि गर्दी नियोजनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर येथील शनिवार (११ जुलै) आणि उरुळी कांचन येथील रविवार (१२ जुलै) रोजी भरणारे आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.
अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासकांना बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बाजार बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक वस्तूंचे पर्यायी नियोजन करावे. तसेच पालखी मार्गावरील वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी महसूल, पोलीस, ग्रामपंचायत तसेच इतर संबंधित यंत्रणा सज्ज असून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
