सिन्नर | प्रतिनिधी :
सिन्नर तालुक्यातील विघनवाडी–कारवाडी रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठे भगदाड पडून रस्त्याचे अक्षरशः दोन तुकडे झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नुकतेच करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय आहे. कारण पहिल्याच पावसात रस्ता खचून दोन भागांत विभागला जाणे हे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या भगदाडामुळे विघनवाडी आणि कारवाडी दरम्यानचा संपर्क बाधित झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना याचा फटका बसत आहे.
ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
आता या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


