शहापूर | प्रतिनिधी
शहापूर नगरपंचायत हद्दीत दूषित पाणीपुरवठा होत असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप करत युवासेनेचे शहर युवाधिकारी हर्षद दिपक राऊत यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात शहरातील नागरिकांना नळाद्वारे गढूळ, दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर वेळेवर न बदलणे तसेच मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे ही समस्या उद्भवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारांची तातडीने साफसफाई करून गाळ काढावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, तसेच धोकादायक इमारती, झाडे आणि विजेचे खांब यांचे सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपंचायतीने २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
युवासेनेचे शहर युवाधिकारी हर्षद दिपक राऊत यांनी नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व प्रतिबंधात्मक कामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल नगरपंचायतीने सादर करावा, अशी मागणी केली आहे.


