
पाथरी | प्रतिनिधी :
पाथरी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृह, पाथरी येथे आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
या जनता दरबारात पाथरी मतदारसंघातील नागरिकांना आपल्या अडचणी, तक्रारी आणि मागण्या थेट आमदार सईद खान यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार सईद खान प्रथमच पाथरी येथे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
या जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, कृषी, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय तसेच इतर जनहिताच्या विषयांशी संबंधित तक्रारी स्वीकारून त्यावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
नागरिकांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. आमदार सईद खान यांचा पाथरीतील हा पहिलाच जनता दरबार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
पाथरी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, तक्रारी आणि मागण्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
