लोहारा | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यासह परिसरात यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सुरुवातीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व अन्य कृषी साहित्याची व्यवस्था करून पेरणीची कामे वेगाने पूर्ण केली. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने, तर काहींनी आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने पेरणी केली.
मात्र, पेरणी पूर्ण झाल्यानंतरही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी होऊन जवळपास आठवडा उलटूनही पावसाचा मागमूस नसल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या उगवणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आर्थिक अडचणींचा सामना करत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज किंवा उसनवारी करून पेरणी केली आहे. आता वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा इतर सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जलसिंचनाची साधने नसलेल्या शेतकऱ्यांसमोर पिके कशी वाचवायची, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
सध्या लोहारा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे आशेने डोळे लावून बसले असून, लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडून खरीप पिकांना जीवनदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
