
प्रतिनिधी :
कुरुंदवाड : रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडचा २८ वा पदग्रहण सोहळा शुक्रवारी (१० जुलै) बालाजी मिनी मंगल कार्यालय, कुरुंदवाड येथे उत्साहात पार पडला. यावेळी शिवाजी बाबर यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी तर हिंदुराव तावदारे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मावळते अध्यक्ष रो. शैलेश व्होरा यांना कॉलर प्रदान करून झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली, तर फोर वे टेस्टचे वाचन रो. अजित पाटील यांनी केले.
या सोहळ्यास डीजीएन (२०२८-२९) रो. वासुकी संजी आणि असिस्टंट गव्हर्नर रो. हर्षवर्धन फडणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा परिचय व स्वागत रो. प्रदीप पाटील (सर) यांनी केले.
यावेळी रो. प्रशांत पट्टेकरी यांनी २०२५-२६ या वर्षातील कार्याचा आढावा सादर केला. मावळते अध्यक्ष रो. शैलेश व्होरा यांनी सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी रो. शिवाजी बाबर, सचिवपदी रो. अमित पाटील, खजिनदारपदी रो. हिंदुराव तावदारे, तर आयपीपी रो. शैलेश व्होरा, प्रेसिडेंट इलेक्ट रो. डॉ. संजय पाटील, क्लब अॅडमिन रो. अनिकेत पाटील, फाउंडेशन रो. सोमनाथ सुतार, सर्व्हिस प्रोजेक्ट रो. सचिन औरवाडे, पब्लिक इमेज रो. शैलेश व्होरा आणि पोलिओ प्लस रो. डॉ. किरण आणुजे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विक्रम कडाळे आणि उत्कर्ष निकम यांना रोटरीचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. तसेच मावळते अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. रो. सोमनाथ सुतार यांचा लेह-लडाख बाईक सफरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
नूतन अध्यक्ष रो. शिवाजी बाबर यांनी आगामी वर्षातील समाजोपयोगी उपक्रमांची रूपरेषा मांडली. असिस्टंट गव्हर्नर रो. हर्षवर्धन फडणीस यांनी शुभेच्छा दिल्या, तर रो. वासुकी संजी यांनी रोटरीच्या समाजसेवेची भूमिका स्पष्ट करत नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास कुरुंदवाड, तेरवाड, टाकळी परिसरातील मान्यवर, रोटरी क्लब शिरोळ व जयसिंगपूरचे सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. अजित पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो. अमित पाटील यांनी मानले. राष्ट्रगीत आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
