
कवठे महांकाळ | प्रतिनिधी
कवठे महांकाळ तालुक्यात यंदा मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून पाणीसाठ्यांमध्ये मोठी घट झाल्याने खरीप हंगामासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
पाणीटंचाईचे गंभीर संकट
तालुक्यातील अग्रणी नदीपात्रातील मळणगाव, शिरढोण, तिरमलवाडी, मोरगाव, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, धुळगाव आणि रांजणी येथील बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या विहिरींची पाणीपातळीही तळाला गेल्याने अनेक गावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांवर संकट ओढवले आहे.
तालुक्यातील १० लघू आणि एका मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाही लक्षणीयरीत्या घटला आहे. लांडगेवाडी तलावात केवळ मृतसंचयी पाणीसाठा शिल्लक असून इतर तलावांमधील पाणीसाठाही मर्यादित आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतीवर मोठा परिणाम
दरवर्षी म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहत होती. मात्र यंदा अद्याप पाणी न सोडल्याने नदीपात्र कोरडे पडले असून घाटमाथ्यावरील गावांनाही पाण्याचा फटका बसत आहे.
गतवर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यात सुमारे ८९ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र पावसाच्या ओढीमुळे पेरण्या लांबल्या असून पाणीअभावी सोयाबीन, मका, तूर आणि भुईमूग यांसारखी खरीप पिके धोक्यात आली आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
पाण्याची तातडीने उपलब्धता करून द्यावी तसेच म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाणी न मिळाल्यास शेती वाचविण्यासाठी पर्यायी उपाययोजनांची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अग्रणी नदी बारमाही झाल्यास हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन तालुक्याला दुष्काळमुक्ती मिळू शकते, असे मतही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
