
कुरुंदवाड | प्रतिनिधी :
आषाढी वारीनिमित्त हरळी खुर्द गावातून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे तेरवाड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा अखंड जप आणि अभंग गात हजारो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
दरवर्षीप्रमाणे हरळी खुर्द येथून निघालेली ही दिंडी तेरवाड (ता. शिरोळ) येथील ज्ञानभारती एज्युकेशन सोसायटी, कुरुंदवाड संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत सायंकाळी सुमारे ४ वाजता दाखल झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी वारकऱ्यांचे पुष्पहार व स्वागत करून त्यांचा आदरातिथ्य केला.
यावेळी वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वारकऱ्याची आस्थेने विचारपूस करत त्यांचे स्वागत केले.
संस्थेच्या सचिव सौ. माधुरी बाबासो सावगावे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या भक्तीभावाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आपण सर्वजण एवढा मोठा पायी प्रवास करत आहात, हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंगल दर्शन लाभो, सर्व मनोकामना पूर्ण होवोत. पुढील वर्षी आम्हालाही आपल्या सोबत पायी वारी करण्याची इच्छा आहे.”
या दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून देसाई गुरुजी, नाईक गुरुजी आणि परीट गुरुजी कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली वारकरी भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
चहा-नाश्त्यानंतर संस्थेच्या वतीने सर्व वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले, संतोष भुयेकर, विनोद चव्हाण, सहदेव डंबाळ, यलगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, सुनीता शिंदे, शैलजा सावगावे, वैशाली घोरपडे, रुपाली निटवे, भारती जोंग, चौगुले मॅडम, शितलकुमार घोरपडे, इरगोंडा बंडगर, छाया माने, सुनीता काडापुरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, निवासी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
