येवला | प्रतिनिधी
येवला-मनमाड रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, या कामासाठी उभारण्यात आलेल्या डांबर (हॉटमिक्स) प्लांटमुळे गायकवाड वस्ती परिसरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, डांबर प्लांटच्या अवघ्या सुमारे २०० मीटर अंतरावर गायकवाड वस्ती असून, प्लांटमधून निघणारा धूर आणि उग्र वासामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. विशेषतः या परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवसभर प्लांटमधून निघणारा धूर शाळेच्या परिसरात पसरत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसताना अडचणी येत आहेत. काही पालकांनी मुलांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची भीती व्यक्त केली असून, आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याचे काम विकासाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मान्य करतानाच, लोकवस्ती आणि शाळेच्या अगदी जवळ डांबर प्लांट उभारणे योग्य नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात किंवा पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

