श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुका महसूल विभागातील रिक्त पदांच्या अभूतपूर्व संकटामुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्याचा विस्तार मोठा असताना,येथील चार मंजूर नायब तहसीलदारांपैकी तब्बल तीन पदे रिक्त अनेक दिवसापासून आहेत.संपूर्ण तालुक्याचा गाडा अवघ्या एक निवासी नायब तहसीलदार आणि तहसीलदारांवर चालत असल्याने यंत्रणा कोलमडली आहे.
तहसील कार्यालयाच्या नियमानुसार ,महसूल सहाय्यक (लेखनिक ) प्रत्यक्ष फाईलवर काम करून ती संबंधित नायब तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवतात.
1 . निवासी नायब तहसीलदार
( प्रशासकीय कामे )
2 . नायब तहसीलदार संजय गांधी योजना ( निराधारांचे मानधन )
3 . नायब तहसीलदार महसूल ( जमीन व शेतीविषयक बाबी )
4 . नायब तहसीलदार निवडणूक ( मतदार याद्या व राष्ट्रीय कामे)
हे चारही अधिकारी आपापल्या विभागाच्या फाईलवर योग्य शेरा मारून ती अंतिम स्वाक्षरीसाठी तहसीलदारांकडे पाठवत असतात.पूर्वी चार अधिकारी असल्याने कामाचा निपटारा जलद गतीने होत असे. मात्र आता महसूल सहायकांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने लेखनिकांवर आधीच अतिरिक्त ताण आहे. त्यातच पुढे फेल तपासणारे तीन अधिकारीच nb असल्याने अनेक फायली टेबलवरच पडून राहतात.
वरिष्ठ कार्यालयाचा ससेमिरा आणि व्हीआयपी दौरे
उपलब्ध दोन अधिकाऱ्यांना दैनंदिन कामाव्यतिरिक्त वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या तातडीच्या माहितीचे संकलन करावे लागते. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन ,मंत्र्यांच्या आढावा बैठका आणि लोकप्रतिनिधींचा जनता दरबार या राजकीय व शासकीय सोपस्कारांमध्ये अधिकाऱ्यांचा मुख्य वेळ खर्ची पडतो.
या विस्कळीत कारभारामुळे सामान्य शेतकरी आणि विद्यार्थी यांना लागणारे विविध शासकीय दाखले वेळेवर मिळेनासे झाले आहेत. शेत जमिनीचे वाद ,रस्त्याची अडवणूक,शिव रस्ते खुले करण्याचे अर्ज महिनोन्महिने प्रलंबित आहेत. न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेले नागरिक तहसील कार्यालयावर मोर्चे आणि आंदोलने धडकावत आहेत .ही आंदोलने आणि कायदा सुव्यस्था हाताळताना अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. यामुळे मूळ प्रशासकीय कामे करण्यासाठी वेळच उरत नाही असे निरीक्षण केले असता लक्षात येते.
यंत्रणा हतबल ; कर्मचारी जनतेच्या रोषाला सामोरे !
महसूल सहाय्यक आणि उपलब्ध अधिकारी रात्रीचा दिवस करून काम करीत असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा डोंगर उपसने अवघड झाले आहे. कामे रखडत असल्याने रोज कार्यालयात येणाऱ्या संतप्त जनतेच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ महसूल कार्यालयाने श्रीगोंद्याची ही कोंडी फोडण्यासाठी तातडीने पूर्णवेळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी ,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.










