हजारो पनवेलकरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमले
पनवेल|प्रतिनिधी |श्रीनाथ(गणेश) लाड|
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य ‘तिरंगा पदयात्रे’चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी, पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेचे नेतृत्व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पावसाची संततधार सुरू असतानाही देशभक्तीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. हातात तिरंगा ध्वज घेऊन युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण पनवेल शहर दुमदुमून गेले.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथून तिरंगा पदयात्रेला उत्साहात सुरुवात झाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळून टपाल नाका, मिरची गल्लीमार्गे पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे देशभक्तीच्या उत्साहात पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
पदयात्रेच्या संपूर्ण मार्गावर तिरंग्याचे रंग, देशभक्तीपर घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे पनवेल शहराला जणू राष्ट्रभक्तीच्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पदयात्रेदरम्यान पावसाची संततधार सुरू होती. मात्र, प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता नागरिकांनी पावसाच्या सरी अंगावर झेलत तिरंगा हातात घेऊन पदयात्रेत सहभाग नोंदविला. पाऊस आणि देशप्रेमाची जिद्द यांचा अनोखा संगम या पदयात्रेत अनुभवायला मिळाला.
विशेषतः युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विविध शाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.
तिरंगा हा भारताच्या सार्वभौमत्वाचा, स्वाभिमानाचा, एकता आणि अखंडतेचा प्रतीक आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे, हा या पदयात्रेचा प्रमुख उद्देश होता.
देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत करावी आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असा ‘देश प्रथम’चा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या तिरंगा पदयात्रेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जयंत पगडे, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, मधू पाटील, अजय बहिरा, रवी जोशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, मयुरेश नेतकर, वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रभुदास भोईर, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत यांच्यासह नगरसेवक, माजी सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या भव्य तिरंगा पदयात्रेमुळे पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला विशेष रंगत आली. तिरंग्याचा सन्मान, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.











