तरडफ गाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कृषी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी त्वरित बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांना देण्यात आले
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संबंधित कृषी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गावातील तलावातून काही व्यक्तींमार्फत अनधिकृतपणे मोटारीद्वारे पाण्याचा उपसा केला जात असल्याने तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या पाणी वापरावर विपरीत परिणाम होत असून अशा अनधिकृत मोटारी तात्काळ बंद करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी संबंधित विभागाकडून प्रकरणाची चौकशी करून शासन नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले
यावेळी मौर्य क्रांती महासंघ, सातारा जिल्हाध्यक्ष कालिदास चोरमले तसेच राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ आदी मान्यवर उपस्थित होते.











