धारासूर : जवळच गोदावरी नदीत मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना विहीर व नदीवरील पंप सुरू करून पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विद्युत मोटारीवर अवलंबून आहेत. मात्र वीजपुरवठा नियमित नसल्याने उपलब्ध असलेले पाणीही पिकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत.
“गोदावरीत पाणी, शेतात पिकं करपली; पाऊस नाही आणि वीजही नाही—शेतकऱ्यांची अवस्था झाली दयनीय!” असे मत शेतकरी परमेश्वर कदम यांनी व्यक्त केले. “पाणी डोळ्यासमोर आहे, गोदावरी वाहतेय; मात्र वीजपुरवठा नसल्यामुळे शेतात पाणी देता येत नाही. त्यामुळे गोदावरी असूनही आमच्या नशिबी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटत असून अनेक ठिकाणी पिकांची पाने कोमेजू लागली आहेत. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही किंवा सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळाला नाही, तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित वीज विभागाने धारासूर परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गोदावरी नदीचे पाणी उपलब्ध असताना केवळ वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे पिके वाया जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.







