पूर्णा | प्रतिनिधी : रुखमाजी डाखोरे
पूर्णा व पालम तालुक्यातील अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीचे अध्यक्ष बळीरामजी कदम यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) उपविभागीय अधिकारी, गंगाखेड यांना निवेदन देऊन अंतेश्वर बंधाऱ्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली.
पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अंतेश्वर बंधाऱ्याच्या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत, त्या जमिनींचे शासनाने भूसंपादन करावे. तसेच संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या बाजारभावाच्या पाचपट दराने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.
शेतकऱ्यांचा हा प्रश्न शासन दरबारी मांडून भूसंपादनाची प्रक्रिया व योग्य मोबदल्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.







