श्रीगोंदा : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून प्रशासकीय चक्रव्यहात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पारनेर शहराच्या मुख्य रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पारनेरच्या मुख्य बाजारपेठेतील आणि सुपे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विळखा तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या मोहिमेला आता सर्व ग्रामस्थ आणि स्थानिक व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे ऐतिहासिक पाठिंबा दिला आहे.
वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन गावकऱ्यांनी ” आधी विकास ,मग बाकी सर्व ” अशी थेट आणि खंबीर भूमिका घेतल्याने पारनेरच्या प्रगतीचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या ,वाहनांची वाढती संख्या आणि होणारी कोंडी लक्षात घेता हा रस्ता तब्बल 22 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जागेच्या उपलब्धतेवरून आणि काही तांत्रिक कारणामुळे ही काम रखडले होते. मात्र लोकप्रतिनिधी ,नगराध्यक्ष ,नगरपंचायत प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
ग्रामस्थानी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून अतिक्रमण हटवण्याच्या आणि मोजणीच्या कामाला गती मिळाली आहे.
या रस्ता रुंदीकरणामुळे केवळ रस्ता रुंद होणार नसून ,शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सुसज्ज दुभाजक ,आधुनिक पथदिवे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याने पारनेरच्या वैभवात भर पडणार आहे.
वाहतुकीची कोंडी फुटल्यामुळे बाहेरील ग्राहक आणि व्यापारी थेट शहरात येतील , ज्यामुळे स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.
गावकऱ्यांच्या सामंजस्याचे तालुक्यात कौतुक
कोणत्याही विकासकामात जमिनीचा किंवा जागेचा वाद हा सर्वात मोठा अडथळा ठरतो. मात्र पारनेरकरांनी आपल्या समजूतदारपणांचे दर्शन घडवत,कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि समजूतदार पणाच्या भूमिकेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेरच्या जागरूक नागरिकांचे कौतुक होत आहे.








