विभागीय प्रतिनिधी
यावल : शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या उद्यानाच्या कामावरून यावलच्या राजकीय वातावरणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी आपल्या प्रयत्नांतून एका कोटी रुपयांच्या निधीतून उद्यानाचे काम सुरू असल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याला भाजपच्या नगरपालिकेतील गटनेत्या तथा नगरसेविका नंदाताई राजेंद्र महाजन यांनी आक्षेप घेतला असून, उद्यानाचे काम यापूर्वीच सुमारे ७० ते ८० टक्के पूर्ण झाले असताना श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नंदाताई महाजन यांनी सांगितले की, जनतेला सत्य माहिती असणे आवश्यक असून, केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी कामांची वेगळी मांडणी करणे योग्य नाही. विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय वाद निर्माण करण्यापेक्षा कामांची गुणवत्ता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावल शहरातील नागरिकांना अनेक विकासकामांची अपेक्षा असून, प्रलंबित कामे मार्गी लावणे हीच सध्याची प्राथमिकता असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. आमदार अमोल जावळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका कोटी रुपयांच्या निधीतून नव्या उद्यानाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, त्यातील सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर यावलकरांना लवकरच उद्यानाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, महाजन यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, “आमदारांनी निधी आणला, काम सुरू केले; मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न दुसऱ्यांकडून होत आहे,” असा आरोप केला. तसेच कामाला मंजुरी मिळण्यापूर्वीच निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर यावलमधील उद्यानाच्या कामावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निधी कोणी उपलब्ध करून दिला, मंजुरी कोणी मिळवून दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी झाली, या मुद्द्यांवरून आता आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. संबंधितांनी निधी, मंजुरी आणि प्रशासकीय कागदपत्रे जनतेसमोर स्पष्ट केल्यास या वादावर अधिक प्रकाश पडू शकतो.










