सकल मातंग समाजाच्या महामोर्चात पाणी-बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात वाटप; संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
तालुका प्रतिनिधी प्रवीण इंगळे
उमरखेड : अनुसूचित जाती (SC) आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने उमरखेड शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात सहभागी झालेल्या समाजबांधवांना दिलासा देण्यासाठी स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्था, उमरखेड यांच्या वतीने पिण्याचे पाणी व बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
महामोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले असताना उन्हाचा व प्रवासाचा त्रास लक्षात घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांसाठी पाणी व बिस्किटांची व्यवस्था केली. ‘समाजाच्या संघर्षात केवळ बोलून नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीचा हात देऊन सहभागी व्हायचे’ या भावनेतून संस्थेने केलेले हे कार्य विशेष ठरले.
या समाजोपयोगी उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय बालप्रसाद श्रीवास्तव, कोषाध्यक्ष अंकुश रामराव काळे आणि सचिव संजय दत्तात्रय ससाने यांनी स्वतः पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाणी व बिस्किटांचे वाटप करण्यापासून ते संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले…
स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा गेल्या अनेक वर्षांचा समाजसेवेचा कार्यकाळ असून, सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचे कार्य संस्थेकडून सातत्याने केले जात असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. समाजातील प्रश्न, अडचणी आणि गरजांच्या वेळी केवळ प्रसिद्धीपुरते न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून सेवा करण्याची संस्थेची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित झाली.
सकल मातंग समाजाच्या न्याय्य मागणीसाठी निघालेल्या या महामोर्चाला संस्थेने दिलेली ‘सेवेची साथ’ ही निश्चितच कौतुकास्पद असून, सामाजिक चळवळीला मदतीचा हात देणारे असे उपक्रम समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक मजबूत करतात. संस्थेच्या या कार्याचे उपस्थित समाजबांधवांकडून कौतुक करण्यात आले.
