शहादा,दि.09(का.प्र.)
शहरातील धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभाग व शहरात पूजेचे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करावी अशी मागणी नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ. भावना चंद्रभान कदम यांनी शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शहादा शहरात दररोज घरगुती पूजा तसेच सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अनेकदा हे निर्माल्य इतर कचऱ्यात अथवा नदी, ओढ्यांमध्ये टाकले जाते. यामुळे जलप्रदूषण होऊन स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या सोडवण्यासाठी शहरात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करावी, प्रमुख मंदिरे व चौकांमध्ये निर्माल्य कलश बसवावेत आणि संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करावे, असा प्रस्ताव सौ. भावना कदम यांनी मांडला आहे.ही मागणी गटनेते प्रा. मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रभान कदम, श्री शिवछत्रपती ग्रुपचे विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.दरम्यान, या विषयावर प्रतिक्रिया देताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले की, पालिकेच्या वतीने निर्माल्याचे संकलन केले जाईल. तसेच हे निर्माल्य स्वीकारण्यासाठी किंवा त्यापासून खतनिर्मिती अथवा अगरबत्ती तयार करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्यास, पालिका ते निर्माल्य संबंधित संस्था सांगतील त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने पोहोचवून देण्यात येईल.











