पाथरी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती
पाथरी (प्रतिनिधी): अहमद अन्सारी पाथरी परभणी
पाथरी तालुक्यात यावर्षीच्या खरिप हंगामात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.जून व जुलै महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने आणि ऑगस्ट महिन्यात लांबलेल्या पावसामुळे खरिपाची पिके पूर्णपणे करपली आहेत.परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अपेक्षीत ५९२.३ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ ३६०.२ मिमी पाऊस झाला असून,तब्बल २३२.१ मिमी पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे.ऑगस्ट महिन्यात तर सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून,जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष वैजनाथ विश्वनाथराव महिपाल यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून, शासनाचे लक्ष वेधत तालुक्यात तातडीने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
शेतकरी आज हतबल असून प्रशासनाने कागदोपत्री आकडेवारी दाखवून परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करू नये,असा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे.जर शासनाने आणि प्रशासनाने यावर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन, धरणे आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. या निवेदनावर काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









