पुणे / खेड: दोन लहान मुलींचे खून करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी (दि.२६) उघडकीस आला आहे.
कार्तिकी सुनिल मकवाने (वय ९) आणि दुर्वा सुनिल मकवाने (वय-८) अशी मुलींची नावे आहेत.
या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत. त्या लगत असलेल्या एका बियरबार मध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळुन आले असल्याचे बोलले जात आहे. या मुली बुधवार (दि.२५) दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला.
मात्र शोध घेऊनही मिळुन न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात मिसिंग तक्रार दिली होती. दोघी सख्ख्या बहिणी असुन बाहेर गावाहून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याची माहिती आहे.
पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे (PI Prabhakar More) यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलाच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघा भर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळुन आल्या.
दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रूग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळुन आल्या. सखोल चौकशी सुरू आहे. मात्र अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हंटले आहे.
राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास ५० वर्षांचा आरोपी असुन अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलीसांनी पहाटे चारच्या सुमारास पूण्यातील एका लॉजवरून अटक केल्याची माहिती आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
Discussion about this post