पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर प्रेस नोट
लातूर प्रतिनिधी
दिनांक : 28 फेब्रुवारी 2026 लातूर जिल्ह्यात पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर पोलीस प्रशासन विशेष भर देत आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी लातूर शहरातील लेबर कॉलनी परिसरातील पोलीस वसाहतीस भेट देऊन सविस्तर पाहणी केली.
सदर पोलीस वसाहतीमध्ये यापूर्वी पोलिसांसाठी एकूण 76 निवासी सदनिका (क्वार्टर्स) बांधण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत गेल्या असून सध्या त्यापैकी फक्त 8 सदनिका वापरात आहेत. उर्वरित क्वार्टर्सची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून काही ठिकाणी संरचना धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
पाहणीदरम्यान असेही आढळून आले की, त्या परिसरात पुरेशी वीज व्यवस्था नाही, सुरक्षा भिंत नाही तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसराचा गैरफायदा घेत काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक तेथे आडोशाला बसून नशापाणी व इतर अवैध प्रकार करत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून समोर येत होत्या. यामुळे परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणी व असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सदर ठिकाणची सद्यस्थिती लक्षात घेता जुने व जीर्ण क्वार्टर्स पाडून त्या ठिकाणी नवीन, आधुनिक व सुसज्ज पोलीस निवासी इमारती उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे भविष्यात पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच परिसरात असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस ठाणे विवेकानंद येथील पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना सदर परिसरात गस्त वाढविणे, अवैध धंदे, नशापाणी तसेच गोंधळ करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनीही परिसरातील समस्या मांडत पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.
पोलीस प्रशासनाकडून परिसर स्वच्छ ठेवणे, सुरक्षित वातावरण निर्माण करणे व असामाजिक प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासन देण्यात आले.
लातूर जिल्हा पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता पोलीस कर्मचारी व नागरिक दोघांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठीही प्रयत्नशील आहे. लेबर कॉलनी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाच्या निर्णयामुळे परिसरातील नागरिक व पोलीस कर्मचारी यांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.










